जळगाव, प्रतिनिधी । जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा फाउंडेशनतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, उपमहापौर कुलभूषण पाटील हे दोन गटातील क्रिकेटचा वाद सोडवण्यासाठी गेले असता एका गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना पूर्ववैमनस्यांतून शिवीगाळ केली. यावेळी कुलभूषण पाटील हे वाद विवाद टाळत तेथून निघून गेले. घरी गेल्यावर त्यांना फोनवर शिवीगाळ केली व तुम्हाला जीवे ठार मारतो अशी धमकी दिली. काही वेळेनंतर एका गाडीत चार ते पाच व्यक्ती त्यांच्या घरी येवून त्यांनी रिव्हाॅवर वरून चार फायर केल्या. सुदैवाने कुलभूषण पाटील यांना इजा झाली नाही. मात्र, त्या हल्लेखोराचा श्री. पाटील यांना मारण्याचा कट होता. या घटनेचा निषेध करत कुलभूषण पाटील यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा अशी मागणी मराठा फाउंडेशनचे पी. एन. पाटील सर तर्फे यांनी केली आहे.