एनआयए भारतीय जनता पक्षाची पाळीव बनली

श्रीनगर: वृत्तसंस्था । जे लोक रांगेत उभे राहण्यास नकार देतात अशा लोकांना घाबरवणे आणि धमकावण्यासाठी एनआयए ही संस्था भारतीय जनता पक्षाची पाळीव बनली आहे, असा शब्दांत मेहबूबा यांनी टीकास्त्र सोडले आहे.

एनआयएने श्रीनगरमध्ये मानवाधिकार कार्यकर्ता खुर्रम परवेज आणि ग्रेटर काश्मीरच्या कार्यालयावर छापेमारी केली. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असंतोषावर भारत सरकारच्या दोषपूर्ण कारवाईचे आणखी एक उदाहरण आहे, असे मेहबूबा मु्फ्ती यानी ट्विट करत म्हटले आहे.

काही दिवसांपू्र्वी मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. जो पर्यंत जम्मू आणि काश्मीरमधील हटवण्यात आलेले ३७० कलम पुन्हा लागू करून येथील जनतेचे हक्क परत मिळत नाहीत, तो पर्यंत आपल्याला निवडणूक लढणे आणि राष्ट्रीय ध्वज घेण्यात कोणताही रस राहिलेला नाही, असे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले होते. जो पर्यंत जम्मू आणि काश्मीरचा वेगळा ध्वज दिला जात नाही, तो पर्यंत आपण तिरंगा उचलणार नाही, असे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले होते.

यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधात जम्मू आणि काश्मीरमध्ये निदर्शने होऊ लागली. रविवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पीडीपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना काही काळासाठी ताब्यात घेतले. हे सर्व आंदोलक मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्याचा निषेध करत होते. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मेहबूबा मु्फ्ती यांच्या एका छायाचित्रावर रंग देखील फेकला.

मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही टीकास्त्र सोडले आहे. मेहबूबा मुफ्ती यांना जर भारत आणि भारताचे कायदे पसंत नसतील, तर त्यांनी सहकुटुंब पाकिस्तानात जावे, असे त्यांनी म्हटले आहे.त्यांनी आता विमानाची तिकिटे काढावीत आणि कराचीला जायला हवे. हवे तर मी त्यांना तिकिटे काढून देतो, असेही पटेल यांनी म्हटले आहे.

Protected Content