पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिला ही अबला नसून सबला नारी आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीत बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले. ते १७ जानेवारी रोजी पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शिवतिर्थ येथे मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा महानंदा पाटील, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, वैशाली सूर्यवंशी, कमलबाई पाटील, दिपाली माने, तिल्लोतमा मौर्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदीकुंकूचा वाण देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मी पाटील, सूत्रसंचलन राजश्री पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार नर्मदा पांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील सुनिता देवरे, कुंदन पांड्या आदींसह शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
नगर परिषद प्रशासनाची अशी ही राजकीय खेळी
– उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरा शहरातील महिलांना एकत्रित करण्यासाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थावर १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या परिसरात व त्यास लागुन विविध काॅलन्यांमध्ये नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५:४५ वाजता करण्यात येणार होता. मात्र त्या दिवशी नगर परिषद प्रशासनाने पाणी पुरवठा न करता कार्यक्रमाच्याच दिवशी व कार्यक्रमाच्याच वेळेस पाणी पुरवठा केल्याने कार्यक्रमास उपस्थित महिलांमध्ये नगर परिषद प्रशासना विरुध्द तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. कार्यक्रमास महिलांची संख्या कमी असावी या उद्देशाने यात काही राजकीय खेळी तर नाही ना ? अशी कुजबूज देखील उपस्थित महिलांमध्ये सुरू होती.