अरुणाचल प्रदेश भारताचाच ; अमेरिकेनेही ठणकावले

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । भारत आणि चीन तणावावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू असताना चीनकडून भारताविरोधात वक्तव्ये केली जात आहे. भारतानंतर आता अरुणाचल प्रदेश भारताचाच भूभाग असल्याचे अमेरिकेने ठणकावले आहे.

अमेरिकेच्या गृह विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेने जवळपास ६० वर्ष अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असल्याचे मानले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी, सैन्य अथवा नागरिकांद्वारे भूभागावर दावा करण्याच्या एकपक्षीय प्रयत्नांना विरोध करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारत आणि चीनने सीमा वाद हा द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सैन्य बळ वापरण्याला विरोध असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा सांगण्यात येतो. तवांग आणि अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे. त्यामुळे भारताने अरुणाचल प्रदेशवरील दावा सोडावा अशी मागणी चीनने केली होती. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असल्याची मान्यता चीनने दिली नाही.

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आणखी एक दावा केला आहे. भारताने पाच मुद्यांवर सहमती दर्शवली असल्याचे चीनने म्हटले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा करण्यात आली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी वर्किंग मॅकनिज्म फॉर कंसल्टेशन अॅण्ड कोऑर्डिनेशनची १९ वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीत सहमतीने निर्णय घेण्यात आले होते. दोन्ही देशांनी सीमेवरील, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती चांगली होण्यासाठी पावले उचलण्यासाठी सहमती दर्शवली आहे. असं चीनचं म्हणणं आहे .

Protected Content