यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या सभागृहात (दि.15 जुलै) सोमवारी जलशक्ती अभियाना संदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत जिल्ह्यातील रावेर-यावल तालुक्याची घटलेली पाणी पातळी उंचावण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील जलपातळी सतत खालावत असल्यामुळे ती उंचावण्यासाठी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर शेतकरी, सामाजिक संस्थांची मते जाणून घेतली. अभियानाचे समन्वयक तथा कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशातील ३६ राज्यातील १५०० दुष्काळग्रस्त तालुके त्यात राज्यातील 8 जिल्ह्यांमधील पाणी समस्या बिकट असल्याने त्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यासाठी जलशक्ती अभियान राबविले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता हे विविध घटकांची मते जाणून केंद्र शासनास अहवाल सादर करणार आहेत. जिल्ह्यात रावेर-यावल तालुक्याची पाणीपातळी दरवर्षी एक-एक मीटरने खालावत असल्याने ही चिंताची बाब आहे. ती उंचावण्यासाठी नागरिक व सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या माध्यमातून शेत-तळे, वन-तळे, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, विविध प्रकल्पातील गाळ काढणे यासारख्या योजना राबविण्यासाठी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.