जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील महिलांनी चालविलेल्या ‘बॉक्स ऑफ हेल्प’ फाऊंडेशनने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक हजार झाडे लावण्याच्या संकल्प केला असल्याची माहिती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुधाताई काबरा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
मायादेवी नगरसह शिवकॉलनी शनिमंदिरामागे येत्या शनिवारी (६ जुलै) सकाळी १०.०० वाजता हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षण दिगंबर पगार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महानगरपालिकेचे महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, यासह इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील लोक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
यावेळी होणाऱ्या एक हजार वृक्ष लागवड मोहिमेत वड, पिंपळ, चिंच, बदाम, निंब, बेल, फापडा, गुलमोहर, पेरू, चिकू, सीताफळ, जांभूळ, यासह, अनेक प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल रहावा ग्लोबल वार्मिंगमुळे जंगलांचा ऱ्हास होत आहे. यामुळे वृक्षांची लागवड करणे, ही काळाची गरज आहे. वृक्ष नसल्याने जळगाव उन्हाळ्यात शहराचे तापमान ४५ ते ४७ अंशांवर पोहचते, हे तापमान वृक्ष लागवडीमुळे काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनने आतापर्यंत ५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या अनेक समस्या सोडविलेल्या आहेत. सोबत मोफत आरोग्य शिबीर, फळ वाटप, औषधी वाटप, नेत्र तपासणी शिबीर असे उपक्रम घेतले आहेत.