कासोदा (प्रतिनिधी) येथील महिला बचत गटाद्वारे अल्प प्रमाणात कर्ज घेण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते. या दरम्यान एका महिलेने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेस विश्वासाने आपल्या नावावर कर्जाने रक्कम काढून दिली असता ती महिला रक्कम घेवून हप्ते न भरता पसार झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.
सध्या ग्रामीण भागात दुष्काळामुळे एका बँकेमार्फत महिलांना १० ते १२ महिला मिळुन प्रत्येक महिलेला १० हजार रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंत पैसे मिळाले आहेत. येथील बस स्टॉप जवळील चांभार गल्ली भागात अश्याचप्रकारे पैसे वाटप करण्यात आले होते. त्यात एका महिलेने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेला आपल्या नावावर कर्ज काढून दिले होते. सदर महिलेने दोनच हप्ते भरले, त्यानंतर ती महिला गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. फरार झालेली महिला ७० ते ८० हजार रुपये घेऊन पसार झाल्याने ज्या महिलेच्या नावाने पैसे काढले होते, ती महिला अडचणीत आली असल्याचे समजते. महिलेने गाव सोडून पसार झाल्याच्या घटनेची गावात मोठी चर्चा सुरू आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनला कसलीही तक्रार देण्यात आलेली नाही.