बापरे….महिलेची आत्महत्या; दोन्ही मुलांना पाजले विष !

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील खंडाळा येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या करून त्याआधी आपल्या दोन्ही चिमुकल्यांना विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली असून यातील एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत वृत्त असे की, खंडाळा येथील विवाहिता अश्विनी किशोर चौधरी ही विवाहिता बुधवारी सकाळी दोन्ही मुले श्रेयस (वय ९ वर्षे) आणि प्रणव (वय ३ वर्षे) यांच्यासह घरी एकटीच होती. सकाळी सव्वादहाच्या सुमारास तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तिचा मोठा मुलगा श्रेयस हा रडत बाहेर आल्याने शेजारच्यांना हा प्रकार समजला. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही मुलांना उलट्या सुरू झाल्या. यातून त्यांना विष पाजण्यात आल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी तातडीने दोन्ही मुलांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील मोठा मुलगा श्रेयसची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, अश्‍विनी किशोर चौधरी हिने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले ? याबाबतची माहिती समोर आली नाही. तिचा पती उच्चशिक्षीत (एमबीए) असून भुसावळातील एका फायनान्स कंपनीत कामाला होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने तो गावी दुग्धव्यवसाय करत असल्याचे कळते. या भयंकर प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content