जमावाच्या मारहाणीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीने दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

 

प्रमिला दिलीप सोनवणे (वय-५७) रा. दापोरा ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमिलाबाई सोनवणे ह्या दोन मले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला आहे. घरकाम व शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १८ मे रोजी दापोरा गावात लग्न होते. बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण लग्नाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा विजय हा ओट्यावर बसलेला होता. त्याच वेळी घरासमोरून कार जात असतांना एकाने दुचाकीचा कारला कट मारला व पसार झाला. कारचालकाने पुढे कार नेवून थांबविली व ओट्यावर बसलेल्या विजयनेच कट मारल्याचा गैरसमज करून त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व लग्नाच्या ठिकाणी निघून गेला. दरम्यान, अज्ञात कारचालक हा कार घेवून लग्नाच्या ठिकाणी जावून पुन्हा १० ते १५ जणांना घेवून येत विजय सोनवणे याला मारहाण करण्यास सुरूवात केली. विजयला मारहाण होत असल्याचे समजताच विजयची आई प्रमिलाबाई, भाऊ अरूण आणि विजयची पत्नी प्रियंका हे आवराआवर करण्यासाठी आले. यात जमावाकडून चौघांना मारहाण करण्यात आली. यात प्रमिलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी २२ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जमावाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रारी नाईवाईकांनी जळगाव तालुका पोलीसांकडे केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Protected Content