वीजेच्या धक्क्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड न्यूज प्रतिनिधी । पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या धरणगाव येथील महिलेला विजेचा धक्का लागल्याने जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा सुरू असतांना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैशाली विजय लोहार (वय-२६) रा. तिलक तलाव जवळ धरणगाव असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वैशाली लोहार या महिला आपल्या परिवारासह धरणगाव शहरातील तिलक तलाव परिसरात वास्तव्याला होत्या. गुरूवारी ६ जुलै रोजी सकाळी पाण्याची लहान ईलेक्ट्रीक मोटार पाणी भरण्यासाठी सुरू करण्यासाठी गेल्या असतांना त्यांनी विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच त्या बेशुध्द झाल्या. त्यांनी स्थानिक नागरीक व शेजारी राहणाऱ्यांनी तातडीने धाव घेवून खासगी वाहनाने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सायंकाळी ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.

Protected Content