राज्यात लॉकडाऊन लागणार ? : आरोग्यमंत्र्यांनी दिले अचूक उत्तर !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले असून आता लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन लागणार का ? या प्रश्‍नाला उत्तर दिले आहे.

या संदर्भात वृत्त असे की, राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना संसर्ग, ओमायक्रॉन चा धोका, लॉकडाऊन आणि निर्बंध यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, दुपटीनं रुग्ण वाढण्याचं प्रमाण असं सुरु राहिलं, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावे. परदेशात लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमायक्रॉन चे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं होतं, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की,  ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं टोपे म्हणाले. तर, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

 

Protected Content