ठाकरे बंधू एकत्र येणार? राजकीय वर्तुळात खळबळ, युतीच्या चर्चेला उधाण!

मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाड्यांच्या हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान, ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, यांच्या संभाव्य एकत्र येण्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन नेते आता एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या मतभेदांवर भाष्य करताना, “महाराष्ट्र मोठा आहे, आमच्यातील वाद किरकोळ आहेत,” असे सूचक विधान केले. या विधानाला सकारात्मक प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनीही युतीसाठी अनुकूलता दर्शवली आहे. “मी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, त्यांनी यासाठी काही अटीही स्पष्ट केल्या आहेत. “माझ्याकडून कुणाशी भांडण नव्हतंच. पण एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. चोरांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत. त्यांचा प्रचार करायचा नाही. अगोदर ही शपथ घ्यायची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची,” असे उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांत सांगितले.

राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत, “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असे सकारात्मक मत व्यक्त केले. “माझ्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. मी ते पाहतो आहे,” असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, या युतीची शक्यता अधिक गडद झाली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या ‘चोरांच्या गाठीभेटी न घेण्याच्या’ अटीमुळे ही युती कोणत्या राजकीय पक्षांना वगळून साकारणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र आले, तर ते राज्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडवू शकतात. दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद विरोधकांसाठी एक मोठे आव्हान उभे करू शकते. मात्र, अनेक वर्षांच्या राजकीय शत्रुत्वानंतर हे दोन नेते एकत्र काम कसे करतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ठाकरे कुटुंबातील या संभाव्य युतीमुळे राज्यातील इतर राजकीय पक्षांनाही आपली रणनीती नव्याने ठरवावी लागणार आहे.

Protected Content