मुंबई–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेवर हिंदी नव्हे, तर गुजराती भाषेचे आक्रमण होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मुंबई आणि महाराष्ट्राला खरी भीती हिंदी नव्हे, तर गुजराती भाषेपासून आहे. मुंबईचे ‘गुजरातीकरण’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्यावर कोणीही चर्चा करत नाही. महाराष्ट्रात गुजराती लॉबी विरोधात बोलणारे आम्हीच एकटे आहोत.” आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी-मराठी वाद मुद्दाम उकरला जात असल्याचे सांगत त्यांनी या सर्व घडामोडी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली. “राज ठाकरे मोदी-शहा यांच्याशी कोणत्या भाषेत बोलतात?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत राज यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. याचप्रमाणे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाविरोधातही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
हिंदी भाषेसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, पण तिला राष्ट्रभाषेसारखा दर्जा दिला गेला आहे. मात्र, शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषेला पहिला क्रमांक असायलाच हवा. तिसऱ्या भाषेच्या शिकवणीसंदर्भात सक्ती नको, ज्यांना शिकायची आहे त्यांनी शिकावी.”
मराठीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी म्हटले, “मराठी ही आमची आई आहे आणि इतर भाषा मावश्या आहेत. आम्ही आईला सोडून मावश्यांचे रक्षण करणार नाही. हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती.”
राजकीय वर्तुळात ईव्हीएम घोटाळ्याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. बीडमधील एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा हवाला देत ते म्हणाले, “ईव्हीएम मशीनवरील पहारा हटवण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याचे सांगण्यात आले. याची चौकशी झाली का?” यावर त्यांनी सरकारला थेट सवाल केला.
मुंबईत मराठी भाषा अबाधित ठेवण्यासाठी आमची भूमिका ठाम आहे, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर “गुलामी”चा आरोपही केला. “दक्षिण भारतातील राज्यकर्ते हिंदीला विरोध करत आहेत, पण आपले राज्यकर्ते अजूनही गुलामगिरीतून बाहेर पडलेले नाहीत,” असे राऊत यांनी सांगितले.