गडकिल्ले लग्नासाठी भाड्याने देण्यात गैर काय ? : उदयनराजे भोसले

0Udayanraje Bhosale 35

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्यात गैर काय ? असा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. या निर्णयात मला काहीच चुकीचे वाटत नाही. उलट या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, असे उदयनराजे यांनी सांगितले.

मी स्वतः पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या मुद्यावर चर्चा केली. त्यांनी मला सरकारचं धोरण पूर्णपणे समजावून सांगितलं. सरकारच्या धोरणात गडकिल्ल्यांचा काही भाग लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याचा उल्लेख आहे. यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही. आपण देवळात लग्न लावतोच ना? असा प्रश्न करत गडकिल्ले भाड्यावर देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. गडकिल्ले भाड्यावर दिल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, अशी आशाही उदयनराजेंनी व्यक्त केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) राज्यभरातील 25 गडकिल्ल्यांची भाडे तत्वावर देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादीसह विरोधकांकडून कडकडीत निषेध करण्यात आला होता.

काय आहे गडकिल्लेचा निर्णय
पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं होतं. राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.

उदयनराजे भोसले यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यातून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उदयनराजे भाजपकडून रिंगणात उतरले असून त्यांच्याविरोधात महाआघाडीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Protected Content