भडगाव (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकल्याचा जल्लोष भडगाव शहरात मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.
मराठा समाजाची आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढा सुरू होता. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४२% हुन अधिक मराठा समाजाची लोकसंख्या आहे. यात बहुतांश मराठा समाजातील लोक अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडले जात आहे. मागील सरकारने मागासवर्गीय आयोगाची शिफारस न घेतल्याने न्यायालयात आरक्षण टिकु शकले नाही. त्यामुळे पुन्हा या सरकारने मागील चुक दुरुस्त करून न्या. गायकवाड समितीने अहवाल परीपुर्ण दिल्याने ते न्यायालयात टिकले म्हणून गायकवाड समितीचे अभिनंदनासह मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या निकालामुळे येथील मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मराठा क्रांति मोर्चाचे समन्वयक राजेश पाटील, विजय भोसले, डॉ. विलास पाटील, सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. अमोल पाटील, प्रशांत पाटील, सौरभ देशमुख, तुषार देशमुख, पारस देशमुख, कल्याण पाटील सौरभ पाटील, राहुल पाटील, भूषण पवार, शुभम भोसले नरेंद्र देवरे ,विशाल पाटील, राहुल पाटील, दिपक पाटील आदी उपस्थित होते.