कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

 

नाशिक, वृत्तसेवा । केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालती आहे. या बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी टीका करत आज आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे. म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे त्यामुळे निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे असा आरोप केला आहे.

कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला असून केवळ २ ते ४ रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो ही कांदा चाळीत सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिला. त्याला आता समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील, अशी भीती संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.

कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याने भरलेले ४०० कंटेनर मुबंई पोर्टवर उभे आहेत. कुठलीही माहिती न देता मुबई पोर्टवर कांदा निर्यात थांबवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर कांदा निर्यात पूर्ववत न केल्यास रस्ता रोको, रेल रोको आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे.

कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ४८ तासात निर्यात बंदी मागे घ्या, अन्यथा नाशिक जिल्ह्यातील टोल बंद करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे व्यापार बंद ठेवण्याचं शेतकरी संघटनांचं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत.

Protected Content