रावेर, प्रतिनिधी | स्मार्ट फोन हा एक वरदान आहे पण त्याचवेळी तो धोकादायकही आहे. आपल्या मुलांना स्मार्ट फोन नक्की द्या पण ज्याप्रकारे तुम्ही गॅस सिलींडर आणि इलेक्ट्रिसिटीचा काळजीपूर्वक वापर करतात तसा त्याचा सावधगिरीने वापर करा. असे प्रतिपादन ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे संपादक शेखर पाटील यांनी आज (दि.११) येथे केले. ते येथील श्री रामदेवबाबा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या कलाविष्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांच्यासमवेत दैनिक सकाळचे निवासी संपादक राहुल रनाळकर, येथील नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, गोटू शेट, हरीष गनवाणी, शितल पाटील, ज्ञानेश्वर महाजन, ओ के पवार व राजु पवार हे मान्यवरही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. रनाळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, स्मार्ट फोनमुळे कुटुंबात संवाद राहिलेला नाही. सध्या स्मार्ट फोनवर उपलब्ध असलेल्या समाज माध्यमातून (सोशल मीडिया) तुमच्या आयुष्याला विशिष्ट बाजूला झुकवण्याचे काम केले जात आहे. पण तुम्ही आपला जीवनप्रवास त्याच्यावरून ठरवू नका. स्मार्ट फोनचा वापर स्मार्टली करा आणि आयुष्य स्मार्ट करा. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सादरीकरणाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.