वर्दीतला चोर बेनकाब : लॉकअप गार्ड कनेक्शन, पीएसआयसह टोळीला पोलीस कोठडी!

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याच्या २५ हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यात चक्क एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रल्हाद पिरोजी मानटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ग्रेड पीएसआय) म्हणून कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय प्रल्हाद मानटे याची चोरी करणाऱ्या टोळीसोबत ओळख लॉकअप गार्ड असताना झाली होती. बसस्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेऊन मानटे याने चोरीची योजना आखली. त्यानंतर त्याने काही सराईत चोरांना हाताशी धरून गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध बसस्थानकांवर चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

जळगाव एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, चोरीसाठी वापरलेली चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका सराईत गुन्हेगाराचाही समावेश आहे. पीएसआय प्रल्हाद मानटे आणि त्याच्या टोळीने आतापर्यंत किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “कुंपणच जर शेत खात असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” सर्व आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याचा अशा गंभीर गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Protected Content