बेरोजगारी दरात गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील बेरोजगारीचा दर गेल्या 2.5 वर्षात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच सीएमआयईच्या अहवालानुसार फेब्रुवारी 2019 मध्ये मासिक बेरोजगारी दरात वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 5.9 टक्के होता, तो यंदा 7.2 टक्के एवढा वाढला आहे. याआधी देखील नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बेरोजगारीची वाढती आकडेवारी मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा आहे.

सीएमआयई या संस्थेकडून प्रत्येक महिन्याला बेरोजगारीसंदर्भातील अहवाल सादर करण्यात येतो. अनेक अर्थतज्ञांच्या टीमकडून या संस्थेच्या अहवालाची पडताळणी होत असते. त्यानुसार, फेब्रुवारी 2019 चा बेरोजगारी अहवाल या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचे प्रमाण अधिकच वाढले असून फेब्रुवारी महिन्यातील बेरोजगारी वृद्धीचा दर 7.2 हा गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक ठरला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये बेरोजगारी वृद्धीचा दर 5.9 टक्के एवढा होता. यापूर्वीही नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने आपल्या अहवालातून गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात असल्याचे म्हटले होते. हा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर, मोदी सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर, मोदी सरकारने हा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले होते. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयाचा लहान-सहान उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळेही बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत होते.

Add Comment

Protected Content