बंगालमध्ये पुन्हा ‘तृणमूल’ : सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी दिल्ली वृत्तसंस्था । येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी केलेल्या टाईम्स नाऊ-सीव्होटरच्या सर्वेक्षणातून पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमुल काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर आसामात भाजप व केरळमध्ये डाव्यांना सत्ता मिळणार असल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

टाईम्स नाऊ-सीव्होटरच्या निवडणुकपुर्व सर्व्हेक्षणाचा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकणू २९४ जागा आहेत. त्यापैकी १५४ जागांवर ममतांच्या पक्षाला विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१६ साली मिळालेल्या २११ जागांपेक्षा हा आकडा ५७ ने कमी आहे. भाजपाला २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपाला १०७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बंगालमध्ये केवळ ३३ जागा मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.

आसाममधील निवडणुकीमध्ये १२६ जागांपैकी ६७ जागा भाजपा आणि मित्र पक्षांना मिळतील तर ५७ जागांवर काँग्रेस आणि मित्र पक्षांना यश मिळेल असा अंदाज आहे. २०१६ साली भाजपा आणि मित्र पक्षांना ८६ तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना केवळ २६ जागांवर विजय मिळवता आलेला.

तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसच्या युतीची थेट लाढाई एआयएडीएमके आणि भाजपाच्या युतीशी होणार आहे. डीएमके आणि काँग्रेसला २३४ पैकी डीएमकेला १५८ जागा मिळत असं सांगितलं जात आहे. तर एआयएडीएमके आणि भाजपाला ६५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज या सर्वेक्षणामधून बांधण्यात आलाय.

केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. १४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये ८२ जागांवर एलडीएफचा विजय होईल असा अंदाज आहे. काँग्रेस आणि युडीएफला केरळमध्ये ५६ जागांवर विजय मिळेल असं या सर्वेक्षणामधून दिसत आहे.

पुद्दुचेरीमधील विधानसभेच्या ३० जागांपैकी १८ जागांवर भाजपा आणि मित्र पक्षांना यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे.

Protected Content