नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय लष्कराबाबत खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून येथील जेएनयूची विद्यार्थीनी आणि सामाजिक कार्यकर्ती शेहला रशीद विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय लष्कर काश्मीर खोऱ्यात लोकांची धरपकड करत आहे. त्यांच्या घरात छापेमारी करत असून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. शेहलाच्या या ट्विटवरून तिला ट्रोलही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराने चौकशी समिती स्थापन केल्यास यासंदर्भातील पुरावे देणार असल्याचेही शेहलाने सांगितले होते. तर भारतीय लष्कराने शेहलाचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर शेहलाने खोटी माहिती पसरविल्याचा तिच्यावर आरोपही करण्यात आला होता.
शेहल रशीद जेएनयूमधून पीएचडी करत आहे. काश्मीर खोऱ्यात सैन्य कारवाई झाल्याची चुकीची माहिती तिने ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहासहीत द्वेष निर्माण करणे, शांतता भंग करणे आणि उपद्रव निर्माण केल्याचेही गुन्हे दाखल करण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.