ही तर राज्य सरकारच्या पतनाची सुरुवात – फडणवीस

fadnvis dhule

वाशिम, वृत्तसंस्था | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नुकतेच राज्यमंत्री पद मिळालेले शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या झळकल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीक केली आहे. या सरकारच्या पतनाची सुरूवात झाली असल्याचे सांगत, केवळ मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

 

हे विश्वासघाताचे सरकार आहे. हे सरकार असेच जाईल, अशी अवस्था आहे. असेही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वाशिम येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, आजच तुम्ही बघा काय अवस्था आहे, सरकार बनले. अगोदर तर विस्तारच होत नव्हता. महिनाभरानंतर विस्तार झाला. विस्तार झाल्यानंतर हे देखील कधीच झाले नाही की, महाराष्ट्राच्या इतिहासात महिनाभर कोण मंत्री आहे, हेच माहिती नाही. मग मंत्री झाले तर आता मंत्र्यांचे खातेवाटप मागील सात दिवसांपासून होत नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. कोणी कृषी विभाग वैगेरे घ्यायला तयार नाही. त्यासाठी भांडण नाही, मलाईदार खाती द्या, पीडब्ल्युडी खाते इत्यादींसारखी खाती मागितली जात आहेत. मलाईदार खात्यांसाठी हे जनतेला विसरून भांडत आहेत. अद्यापही या सरकारचे खाते वाटप झालेले नाही.

तसेच, खातेवाटप होण्याअगोदरच मला समजले की, आता त्यांच्या एक मंत्र्याने राजीनामा देखील दिला आहे. ते म्हणाले की, मला मंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मला राज्यमंत्री बनवलं असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरूवात सरकार बनायच्या आतच झालेली आहे.

Protected Content