जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो – अदर पुनावाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.  देशभरात लसींचा तुटवडा भासू लागला आहे. जुलै महिन्यापर्यंत लसींची कमतरता भासू शकते असं सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

अदर पुनावाला म्हणाले की, जुलै महिन्यापर्यंत लसींचं उत्पादन ६० ते ७० मिलियनपासून १०० मिलियनपर्यंत वाढू शकतं.केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरु केली आहे. अशावेळी हा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पुनावाला म्हणाले की जानेवारीमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यावर त्यात पुन्हा वाढ होऊन दुसरी लाट येईल असं वाटलं नव्हतं. सगळ्यांनाच वाटत होतं की भारताने या महामारीवर मात करायला सुरुवात केली आहे, असंही ते म्हणाले.

भारतामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी   भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असं म्हटलं आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली.

Protected Content