जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रायपूर कुसुंबा येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात टोकाचा निर्णय घेत आपली जीवन यात्रा संपविली. ही घटना गुरुवारी २६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीकांत मोहन धनगर वय-२१, रा.रायपूर कुसुंबा ता. जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावात श्रीकांत धनगर हा आईवडील आणि भाऊ जय यांच्यासोबत वास्तव्याला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. आज गुरुवारी २६ जून रोजी श्रीकांत हा घरी एकटाच होता. त्याचे आई-वडील कामाला गेलेले होते. तर भाऊ जय हा कामानिमित्त बाहेर होता. दरम्यान त्याने एकटा असताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता त्याचा भाऊ जय हा घरी आला, त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्याला मयत घोषित केले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई उज्वला, वडील मोहन धनगर आणि भाऊ जय असा परिवार आहे.