भीषण अपघातात एकाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावर नेहरू नगर परिसरात विजेच्या डिप्पीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना रविवारी १० मार्च रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. कबीर भिवा चव्हाण (वय ४४, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कबीर चव्हाण हे आपल आई, पत्नी, २ मुले, भाऊ यांच्यासह शिरसोली येथे राहतात. जैन व्हॅली कंपनीत काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. रविवारी १० मार्च रोजी कबीर चव्हाण हे जळगावहून किराणा साहित्य घेऊन घरी शिरसोली येथे निघाले होते. शिरसोली नाका पार केल्यावर नेहरू नगर परिसरात वासुदेव महाजन यांच्या बंगल्याजवळ त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ९१५१) ने विजेच्या डीपीला जोरदार धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Protected Content