Home क्राईम नंदिनीबाई वामनराव विद्यालयात विद्यार्थिनींना सुरक्षा व सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन

नंदिनीबाई वामनराव विद्यालयात विद्यार्थिनींना सुरक्षा व सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या डी.वाय.एस.पी. सह्याद्री बीरले आणि दामिनी पथकाने सदिच्छा भेट देत विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. यावेळी स्वतःची सुरक्षा, संकटांचा सामना आणि सायबर क्राईमपासून बचाव याबाबत विद्यार्थिनींना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान डी.वाय.एस.पी. सह्याद्री बीरले आणि दामिनी पथकातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात वावरताना स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य कसे द्यावे, याबाबत विविध सूचना दिल्या. कोणत्याही प्रसंगी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा तसेच संशयास्पद घटना किंवा व्यक्ती आढळल्यास योग्य वेळी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आणि स्वरूप बदलत असल्याने विद्यार्थिनींनी सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वैयक्तिक माहिती, फोटो, पासवर्ड किंवा संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक, संदेश किंवा ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहावे, अशा स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थिनींना देण्यात आल्या.

सायबर क्राईम म्हणजे काय, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास कोणत्या पद्धतीने तक्रार करावी, याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत, कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. डी. वराडे सर यांनी नेटकेपणाने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती एस. एम. राणे मॅडम होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींनी मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून दैनंदिन जीवनात अधिक सतर्क आणि जागरूक राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. संगीता चौधरी मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, डी.वाय.एस.पी. सह्याद्री बीरले, दामिनी पथकातील अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले. पोलिस प्रशासन आणि विद्यार्थिनी यांच्यात थेट संवाद घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound