तुकारामवाडीत जीवघेणा हल्ला करणाऱ्या ६ संशयितांच्या मुसक्या आवळल्या; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकारामवाडी येथे राहणाऱ्या जुन्या वादातून एकाच्या घरात घुसून शिवीगाळ करत घराचे दरवाजे व खिडकी तोडून नुकसान करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता वाघ नगर परिसरातून अटक केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात अरुण भीमराव गोसावी वय-४७ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सन-२०२२ मध्ये झालेल्या खूनाच्या संदर्भात संशयित आरोपींविरोरात अरूण गोसावी यांनी फिर्याद दिली होती. याचा राग धरून संशयित आरोपी भूषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ सुकलाल खंड्या ठाकूर, पवन उर्फ बंद्या दिलीप बाविस्कर, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी सर्व रा. तुकाराम वाडी, जळगाव आकाश उर्फ ब्रो रवींद्र मराठे आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशील दोन्ही रा. पिंपळा यांनी शनिवारी ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अरुण गोसावी यांच्या घरावर जीवघेणा हल्ला चढविला. यात संशयित आरोपींनी अरूण गोसावी यांच्या घरात घुसून त्यांच्या घराचे दरवाजे खिडक्या आणि घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले. शिवीगाळ करून जीवे ठार मानाची धमकी दिली होती. या संदर्भात दुसऱ्या दिवशी रविवार ७ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे फरार झाले होते. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपींना वाघ नगर परिसरातून अटक केली आहे. अटकेतील संशयित आरोपींना बुधवारी १० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, संजीव मोरे आणि साईनाथ मुंडे यांनी केली आहे.

Protected Content