बेंगळुरू वृत्तसंस्था । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सांयकाळी 7 वाजता खेळण्यात येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेमध्ये भारत १-० आघाडीवर असून, आजचा सामना जिंकून मालिकाविजय साकारण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर असेल. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका संघाला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य आहे. तसेच पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेटनी विजय नोंदवला. त्यामुळे रविवारच्या सामन्यासाठीही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याच्यासह श्रेयस अय्यरही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मधल्या फळीची मदार प्रामुख्याने या दोघांवर आहे. यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला सापडत नसलेला फॉर्म ही भारतीय संघाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पंतसाठी आता पर्यायी खेळाडू शोधण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.