लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार – पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  निवडून देणारी जनता ही राज्याचे दैवत असते, या जनता जनार्दनाला नजरेसमोर ठेवून व सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.  ते तळोदा येथे नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.

यावेळी माजीमंत्री व आमदार सर्वश्री जयकुमार रावळ, राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस व शहरातील पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मला या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळाली. राज्याचा मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा मंत्री या नात्याने पुनर्वसनाचा एखादा प्रश्न प्रलंबित असेल, तेथे काही नागरी सुविधांची गरज असेल तर अथावा काही टप्पे बाकी असतील तर त्यास तात्काळ मंजूरी देण्याबरोबरच मदत व पुनर्वसनाच्या बाबतीत शेतकरी हा शासनाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व सर्वोच्च प्राथमिकचा विषय आहे.

शेतकऱ्यांचे मदत पुनर्वसनाचे प्रस्तावास एका दिवसात मंजूरी देण्याची ग्वाही देताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून तळोदा नगरपालिकेला लोकसंख्येच्या निकषावर १०० टक्के निधी देण्यात येईल. नगरपालिकेमध्ये काम करत असताना लागणाऱ्या निधीची तरतूद हा अत्यंत कळीचा विषय असतो. त्याचबरोबर नागरी सुविधांसाठी लागणारे मनुष्यबळ, वेतन, पेन्शन, पाणी, वीजबिल हे सुद्धा यक्षप्रश्न बनून उभे ठाकतात. आपल्या आराखड्यात सोलर प्रकल्पाची तरतूद नसेल तर ती आजच करून घ्या. आज जवळ-जवळ सुमारे ४० हजार लोकवस्तीच्या व सुमारे २०ते २२ हजार मतदारांच्या शहरासाठी आमदार राजेश पाडवी यांनी ७० कोटींचा निधी आणला, हे त्यांचे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनास पात्र आहे.

Protected Content