नगरदेवळा येथील ग्रामसभा ठरली वादळी

पाचोरा प्रतिनिधी ।  तालुक्यातील नगरदेवळा येथे नुकतीच ग्रामसभेत भ्रष्टाचार, अपहार मिळत नसलेल्या सुविधा तसेच विविध विषयांवर ग्रामविकास अधिकारी, सरपंच व ग्रामस्थ यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याने ग्रामसभा वादळी ठरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सरपंच प्रतीक्षा काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत झालेल्या खर्चाचे वाचन ग्रामविकास अधिकारी यांनी केले. त्यानंतर तंटा मुक्ती समिती अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. १४ व्या वित्त आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यात १५ लाख रुपयांची जलवाहिनी अपूर्ण असून बिले कशी काढण्यात आली. तसेच १४ व १५ व्या वित्त आयोगामध्ये झालेली कामे नित्कृष्ट दर्जेची झालेली आहेत त्या कामांची चौकशी व्हावी, तसा ठराव करण्यात यावा अशी मागणी माजी उपसरपंच नामदेव पाटील, विलास पाटील यांनी केली.

तसेच ग्रामनिधी मधून १५ टक्के निधी अपंग बांधवाना वाटप करण्याचे शासननिर्णय असतांना सन – २०१३ पासून तो वाटप झाला नसल्याने त्वरित वाटप करावा असे अनिल पाटील यांनी सांगितले तर शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना होत नसल्याने गावात दवंडी देण्यात यावी, लसीकरणात राजकारण करीत असल्याने वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील यांची बदली करण्यात यावी, कोणत्याही सुखसोयी मिळत नसतांना घरपट्टी पाणीपट्टी ची केलेली कर आकारणी रद्द करावी, कार्यालयात नियमित न येत असल्याने व मुख्यालयी हजर राहत नाहीत म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष शिवणेकर याची बदली व्हावी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, मुबलक पाणीसाठा असतांना आठ दिवसात पिण्याचे पाणी का  मिळते ? त्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी व्हावी, रोजगार हमी योजनेत योग्य व खऱ्या लाभार्त्यांचा समावेश व्हावा, घरबांधकाम साठी बैलगाडीने वाळू उचलण्यास परवानगी मिळावी, गडद नदीपात्रातील वाळूचा निलाव करावा अश्या विविध विषयांवर उहापोह होऊन तसे ठराव ग्रामसभेत करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी ग्रामसभा घेतली जाते.

पण शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचत नसल्याने व पुरेश्या सुखसोई मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत च्या मनमानी कारभाराला कडाडून विरोध केला. ग्रामसभेला माजी सरपंच अरुण काटकर, डॉ. योगेश बसेर, सिद्धार्थ पवार, सागर पाटील, शैलेंद्र परदेशी, किरण काटकर, सुभाष कोकंदे, अभिजित पवार, संजय भोई, उमेश लढे, भूपाल पवार, नारायण पाटील, धनराज चौधरी, रज्जाक शेख,भैया महाजन, सुनील तावडे, सचिन गढरी, सुनील राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, पत्रकार, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Protected Content