केंद्र सरकारने कोरोना योद्ध्यांचे विमा छत्र काढल

 

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात कोरोना महामारी विरोधात आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत असतांना मोदी सरकारने कोरोना कालावधीत कामावर असतांना प्राण गमावलेल्या कोरोना योद्ध्यांना देण्यात येणारी ५० लाखांची विमा सुरक्षा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना संपुष्टात आणत असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.  कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना संसर्ग झाल्याने मरण पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येत होतं. कोरोना कालावधीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील महिन्यामध्ये राज्य सरकारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये २४ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत २८७ अर्ज असल्याचंही केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ३० मार्च २०२० पासून राबवण्यात येत होती. सुरुवातील केवळ ९० दिवसांसाठी ही योजना राबवण्यात आली. नंतर या योजनेचा कालावधी २४ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आलेला,” असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या पत्रामध्ये, “ही योजना आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची ठरली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणे तसेच कोरोना कालावधीमध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना यामुळे फायदा झाला. ही योजना नियोजित तारखेला बंद करण्यात आलीय,” असं म्हटलं आहे.

 

Protected Content