मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात आजपासून बारावीची बोर्ड परीक्षा सुरू झाली आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये घेता याव्यात म्हणून कठोर नियमावली राबवली जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी देखील सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश दिले आहेत.
आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी बोर्ड परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला आहे. आज पासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. राज्यात ही परीक्षा 3373 परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार असून ती 5130 परीक्षा केंद्रावर अयोजित केली आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोर्ड परीक्षेच्या परीक्षा केंद्र भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्ण प्रतिबंध घालण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल) जवळ ठेवणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते.
राज्यात बोर्ड परीक्षेच्या सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, या बैठया पथकाने पेपर सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.