ठाकरे सरकार कंत्राटदारधार्जिणे : दरेकरांचा आरोप

मुंबई– राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार कंत्राटदारधार्जिणं झालं आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

राज्य सरकारने अनेक विकास कामांना कात्री लावलेली असतानाच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधीची उधळण करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं उघड झालं आहे. यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकार संवेदनाहीन असून कंत्राटदारांचे पाठीराखे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगल्यावर ३ कोटी २६ लाख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर १ कोटी ७८ लाख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुडा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३३ लाख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगलावर दोन कोटी २६ लाख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगल्यावर १ कोटी ४६ लाख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शिवनेरी बंगल्यावर १ कोटी ४४ लाख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर १ कोटी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या बंगल्यावर १ कोटी ४० लाख, नितीन राऊत यांच्या पर्णकुटीवर १ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही बंगल्यांवर दोन कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.  या दुरुस्तीसाठी एकूण ९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी महागडे इटालियन मार्बल वापरण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

Protected Content