पूर्व लडाखमध्ये तणावाची परिस्थिती ; लष्करप्रमुख आढाव्यासाठी पोहचले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेता, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज सकाळी लडाखमध्ये दाखल झाले.

पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने २९-३० ऑगस्टच्या रात्री अचानक या भागात घुसखोरी करुन एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला.

त्याचवेळी भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. त्यामुळे रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताचे नियंत्रण आहे. फक्त २९-३० ऑगस्टच्या रात्रीच नव्हे, त्यानंतरही चीनने घुसखोरीचे प्रयत्न केले. पण भारतीय सैन्याने प्रत्येकवेळी त्यांचा डाव हाणून पाडला.

मागच्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांध्ये चर्चा सुरु आहेत. पण या सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. चीन पँगाँग टीएसओ भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चिनी सैन्य फिंगर आठपर्यंत असते. पण एप्रिलमध्ये ते फिंगर फोरपर्यंत आले. त्यांनी पूर्वी होते त्याच ठिकाणी फिंगर आठ पर्यंत माघारी फिरावे,अशी भारताची मागणी आहे.

Protected Content