पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाचा समारोप मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका करत परखड शब्दात अनेक बाबींचा समाचार घेतला.
याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, “काही लोकांनी श्री राम, श्री हनुमान या सारख्या देव देवतांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी पक्षात प्रवेश करुन घेतला असून भाजपावाल्यांनी तर शिवसेना हा पक्ष मुळ विचारापासून लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. माझ्या जिल्ह्यात माझ्या पक्षाचे पाच आमदार असल्याने राज्यात मनसेचा केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असून राज ठाकरे यांनी बाळा साहेबांसारखी भगवी शाल घातली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहू नये. त्यांचे भोंगे कधी पासूनच बंद झाले आहेत, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
पुढे बोलतांना पालकमंत्री यांनी असून खा. नवनीत राणा यांचेवर नाव घेता टिका करतांना, “सध्या प्रत्येक टी. व्ही. चॅनलवर व वृत्तपत्रांवर एकच चेहरा दिसत असून नागरिकांनीही तो चेहरा किती वेळा पाहावा. व मिडियानेही एखाद्याचे किती कौतुक करावे.” याबाबतही विचार करण्यासारखी गोष्ट असल्याचे विधान केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तावडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उप महापौर कुलभूषण पाटील, सुनिल पाटील, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, विराज तावडे, मा. नगराध्यक्ष संजय गोहिल, रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, प्रविण ब्राम्हणे, जावेद शेख, मतिन बागवान, आयुष बागवान, प्रविण ब्राम्हणे, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, शिवदास पाटील, रवि गीते आदींची उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “शिवसैनिकांनी राज्यात झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेवून शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना जागेवरच उत्तर देण्याची धमक ठेवावी. केंद्र सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव गगणाला भिडले असून दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. वाढत्या महागाईपासुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे काही लोक शिवसेनेची बदनामी करत आहेत.
यावेळी खा. उन्मेष पाटील यांच्यावर टिका करतांना ना. पाटील म्हणाले की, “गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या ९ दिवसांत मोठ्या फरकाने निवडून आणले. मात्र ते माझ्या निवडणुकीचा साधा उमेदवारी अर्जही दाखल करण्यासाठी आले नाही. ते जर आम्हाला होत नाही तर सर्व सामान्य जनतेला काय होतील. असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी आश्वासित केले. भविष्यातील नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असुन येत्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची सत्ता ही एक हाती शिवसेनेकडे असेल.” असा आस्वाद त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्याच्या समारोप प्रसंगी आ. किशोर पाटील, गुलाबराव वाघ, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, विष्णु भंगाळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नगरदेवळा, गाळण व शिंदाड येथील अनेक युवक व महिलांनी विविध पक्षातुन शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले.
शिवसंपर्क अभियाना निमित्त आ. किशोर पाटील, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, सुमित किशोर पाटील, किशोर बारावकर यांचेसह युवा सेनेच्या पदाधिकारी व युवकांनी मोटरसायकल वरुन भगवे झेंडे लावुन महालपुरे मंगल कार्यालया पासून जारगाव चौफुली, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.