पारोळ्यात नवीन जलकुंभाचे काम लवकर करण्याबाबत निवेदन

पारोळा प्रतिनिधी । नवीन जलकुंभाचे लवकरात लवकर काम सुरू करून पारोळा शहरवासीयांची तहान भागवा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील यांच्यातर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांना देण्यात आले आहे.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची साठवणूक सुविधा, जलकुंभ व जलशुद्धीकरण ची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे या करिता शासना कडून निधी उपलब्ध करून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, पारोळा यांनी लेखी मागणी केली. त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महाराष्ट्रराज्य यांच्या कडे दि.२७-१० २०२१ रोजी पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारणे व फिल्ट्रेशन प्लांटची क्षमता वाढविणेबाबत कामासाठी विशेष निधीची मागणी केली. त्यावर त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन शासनाच्या नगर विकास विभागा मार्फत वैशिट्यपूर्ण योजने अंतर्गत १ कोटी रुपये निधी मंजूर केला. व याबाबत शासन निर्णय क्र.नपावै-२०२१/प्र.क्र.२०१(५)/नवि-१६ दि.03 -11-2021 रोजी आदेश सम्बन्धितांना दिले.

पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनी द्वारे पारोळा शहराला पुरविले जाते. धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांनाही शहरातील नागरिकांना ८ ते १० दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. या नवीन जलकुंभ उभारणी व जलशुद्धीकरणाची क्षमता वाढल्या नंतर शहराला किमान एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे सहज शक्य होईल, याबाबत शहरवासीयांची कित्येक वर्षापासून असलेली मागणी होती. वरील कामासाठी मिळालेला निधी मार्च २०२२ अखेर पर्यत खर्च करणे गरजेचे असल्याने सदर कामाचे लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेऊन ईस्टीमेट, तांत्रीक मंजूरी, कार्यादेश देऊन काम सूरू करून शहरवासीयांची तहान भागवावी, असे निवेदन मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांना डॉ. हर्षल माने शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील यांनी दिले.

 

 

 

Protected Content