राज्य सरकारने वेश्यांच्या पैशांवरही डल्ला मारला : फडणवीसांचा गंभीर आरोप

गडचिरोली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था |  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणार्‍या मदतीच्या पैशांवरही डल्ला मारल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. येथील महा जनआक्रोश यात्रेत त्यांनी सरकारवर घणाघाती आरोप केले.

विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली आज गडचिरोली येथे महा जनआक्रोश यात्रा काढण्यात आली. यात बोलतांना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, या सरकारची नियत काय आहे बघा, केंद्र सरकारने सांगितलं करोना काळात दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा. त्यांना मदत करण्याची घोषणा करण्याची घोषणा केली. आम्हाला वाटलं चला एका घटकाला तरी हे मदत करत आहेत, पण हे नालायक निघाले. नांदेडमधील केस आहे, मी परवा हे सभागृहात मांडलं. एका कुठल्यातरी संस्थेला पैसे दिले आणि त्यांनी वेश्यांना द्यायला हवे ते पैसे आपल्या नातेवाईकांमधील लोकांना वाटून टाकले. वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणार्‍यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तुम्हाला देखील माहिती आहे. तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल. कारण या सरकारमध्ये वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज पाहायला मिळतात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हे सरकार किती नालायक आहे, मोदींनी करोनाच्या काळात गेली दोन वर्षे आमच्या गरिबांकरता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. हजारो टन अन्नधान्य या महाराष्ट्रात आलं. अनेक गोडाऊनमध्ये तांदुळ-गहू सडला, पण मोदींचं नाव होईल म्हणून या सरकारनं त्या गरिबांपर्यंत अन्नधान्य देखील पोहचू दिलं नाही.  जोपर्यंत या सरकारच्या विरोधात संघटीत होत नाही, जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापायला लावत नाही तोपर्यंत हे सरकार वठणीवर येणार नाही. म्हणून हा एल्गार आम्ही गडचिरोलीतून सुरू केलाय, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Protected Content