खान्देशातील खेळाडूंसाठी क्रीडा विज्ञान केंद्र उभारणार: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील खेळाडूंमध्ये असलेल्या उपजत गुणवत्तेला वाव देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली. विद्यापीठात आयोजित ‘जिमखाना डे’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. म. सु. पगारे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य डॉ. एस. टी. पाटील, डॉ. आय. डी. पाटील, स्वप्नाली काळे (महाजन) आणि क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.

मंत्री खडसे पुढे म्हणाल्या की, “खान्देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करून, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देश पातळीवरील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये सहभाग घ्यावा, अशी तयारी करावी. चौकटीबाहेर जाऊन खेळाबद्दल विचार करावा.” विद्यापीठात क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान केंद्र उभारण्याचे आश्वासन देताना, विविध क्रीडा कोर्सेस विद्यापीठात सुरू करता येतील असेही त्यांनी सांगितले. खेळाडूंनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (SAI) प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, कारण क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्याची मोठी संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून घराघरात खेळ पोहोचवण्यासाठी योजना तयार केली आहे, या योजनेचा लाभ विस्तारित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागून मैत्रीपूर्ण वातावरण तयार होते, असेही त्यांनी नमूद केले.

व्यवस्थापन परिषद सदस्य आणि जिमखाना समितीचे अध्यक्ष ॲड. अमोल पाटील यांनी यावेळी सांगितले की, “खेळाडूंचा खेळताना अपघात झाल्यास त्यांना मदत मिळवण्यासाठी विद्यापीठ खेळाडू अपघात विमा योजना सुरू करण्याची आखणी विद्यापीठ करत आहे.” तसेच, खेळाडू विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, “विद्यापीठाने क्रीडा विभागासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.” खेळाडूंनी केवळ विद्यापीठ स्पर्धांपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, सातत्य, सराव आणि क्षमता विकसित करणे आवश्यक असून, त्यासाठी क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होतील त्यांना विद्यापीठाकडून मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सोनगीर महाविद्यालयातील प्रथमेश देवरे यास, तर २०२४-२५ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार येथील रिंकी पावरा यांना जैन इरिगेशन पुरस्कृत खाशाबा जाधव सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू, तसेच दक्षिण पश्चिम विभागीय, अखिल भारतीय, आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा व क्रीडा महोत्सव स्पर्धा तसेच भारतीय विद्यापीठ संघात निवड झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक प्राप्त खेळाडू आणि नुकत्याच जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा एकूण २२० खेळाडू व महाविद्यालयातील ४६ क्रीडा संचालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले आणि आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले.