मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती द्या; मुख्य अभियंत्यांचे निर्देश

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहेत.

मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी वीज बिल वसुली, वीज चोरी मोहीम आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी प्रत्येक महिन्यात आणि वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावावी. यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा आणि महावितरणच्या ऑनलाइन प्रणालीत त्याची नोंद घ्यावी. पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय ग्राहकाचा वीज पुरवठा पूर्ववत होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी विभागनिहाय वीज चोरीविरुद्ध राबविण्यात येत असलेली मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. या मोहिमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “वीज बिल नाही तर वीज नाही” अशी स्पष्ट भूमिका घेत वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना अनाधिकृतपणे वीज पुरवठा सुरू केला असेल, तर त्या ग्राहकांवरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मुख्य अभियंता नाईक यांनी मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्याचा उल्लेख करत नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तांत्रिक दोष निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना तात्काळ माहिती द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा, असे निर्देशही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

Protected Content