तर, बहुतेक उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार- अतुल भातखळकर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात मविआतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे हेच २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी राहतील असे खा.संजय राउत म्हणतात, तर अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, नवस फेडीन असे खा.सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे, त्यामुळे बहुतेक उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होतील अशी खोचक टीका भाजपचे आ.अतुल भातखळकर यांनी ट्वीट करीत दिली आहे.

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, राष्ट्रवादीच्या पक्षातील सर्व आमदारांना घेऊन नवस फेडीन असे, तुळजाभवानीला साकडे घातले. कट्टर पुरोगामी म्हणवणारे राजकीय नेतेच मंदिरांचे उंबरठे झिजवत नवस बोलायला लागले हे आश्चर्य आहे.  आणि पुढची २५ वर्ष देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील असे, खा.संजय राउत यांनी प्रतिक्रिया देताना ठामपणे म्हटले असून राज्याच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात, सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असून आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे उत्तम प्रकारे करत आहेत.

महाविकास आघाडीतील सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर समाधानी असल्याचा संजय राऊत यांचा दावा खरा व्हावा आणि सुप्रिया सुळे यांचा नवस देखील पूर्ण व्हावा, यासाठी मधला मार्ग म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधून पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार म्हणून राऊत समाधानी आणि अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर तुळजा भवानीचा नवस पूर्ण होऊन सुळे समाधानी, यावरून बहुदा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार, असा टोला भातखळकर यांनी केला आहे.

 

 

 

Protected Content