चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील ४२ वर्षीय तरुण जगदीश झुलाल ठाकरे यांच्या अपहरणाने आणि त्यानंतर निर्घृण खुनाने खळबळ उडाली आहे. २९ जून रोजी वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने घरातून नेलेल्या जगदीशचा जुन्या राजकीय वादातून खून करून, त्याचा मृतदेह चाळीसगाव ते कन्नड घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे धुळे आणि चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मयत जगदीश ठाकरे यांची पत्नी अरुणा ठाकरे (वय ३२) यांनी गुरुवारी, ३ जुलै रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, २९ जून रोजी अशोक मगन मराठे, शुभम संभाजी सावंत आणि एक अनोळखी २४ वर्षीय तरुण (सर्व रा. मोरदड, ता. जि. धुळे) यांनी जगदीशला मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून घरातून सोबत नेले. मात्र, त्यानंतर जगदीश घरी परतलेच नाहीत.
पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असता, जगदीशचा जुन्या राजकीय वादातून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. खुनानंतर आरोपींनी जगदीशच्या मृतदेहाची चाळीसगाव ते कन्नड घाटात विल्हेवाट लावली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, तिन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय वैमनस्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. एका तरुणाचा अशा प्रकारे खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.