Home क्राईम धक्कादायक ! बंगळुरूत मोदींच्या सभास्थळाजवळ स्फोटके आढळल्याने खळबळ 

धक्कादायक ! बंगळुरूत मोदींच्या सभास्थळाजवळ स्फोटके आढळल्याने खळबळ 


बंगळुरू- वृत्तसेवा । कर्नाटक दौऱ्यावर आलेले पंतप्रधान Narendra Modi यांच्या नियोजित सभास्थळाजवळ स्फोटक साहित्य आढळून आल्याने बंगळुरूत एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेल्या ठिकाणापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर दोन जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. कागलीपुरा परिसरातील एका आश्रमाजवळील फुटपाथवर हे स्फोटक साहित्य सापडल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता या परिसरात आधीपासूनच कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती.

रविवारी सकाळी नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान पोलिसांना संशयास्पद वस्तू दिसून आली. त्यानंतर परिसराची झडती घेतली असता फुटपाथलगत दोन जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले असून, परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

या घटनेनंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा कवच देण्यात आले असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळाच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून, संशयित हालचालींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या जिलेटिनच्या कांड्या नेमक्या कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे कोणतेही कटकारस्थान आहे का, याचाही तपास सुरू आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या असून, प्रत्येक बाबीची बारकाईने चौकशी केली जात आहे.

या धक्कादायक घटनेमुळे बंगळुरूसह संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवल्या आहेत. तपासानंतरच या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound