सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांच्याबाबत मंत्री शंभुराज देसाई यांनी आज अतिशय खोचक असे उदगार काढून त्यांना खिजवले आहे.
शिंदे गटातील बहुतांश नेते हे सातत्याने खासदार संजय राऊत यांच्यावर टिका करत असतात. तर राऊत हे दररोज शिंदे गटाला जेरीस आणत असतात. एका अर्थाने दोन्ही गटांमध्ये राऊत विरूध्द शिंदे गट असाच सामना बहुतांश रंगत असल्याचे आजवर दिसून आले आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार वारिसे यांच्या खून प्रकरणी राज्य सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी यावर खोचक भाष्य केले आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे बोलतांना देसाई म्हणाले की, आधी संजय राऊत यांना लोक किमान ऐकत तरी होते. मात्र आता ते दररोज सकाळी जी काही बडबड करतात ती कुणीही ऐकत नाही. किंबहुना अनेक लोक संजय राऊत यांना पाहून टिव्ही बंद करतात असे टिकास्त्र त्यांनी सोडले. राऊत बोलत असतांना किती लोक टिव्ही पाहतात ? याचा सर्व्हे हा मीडियानेच करावा असा सल्लादेखील शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी दिला.