
जळगाव प्रतिनिधी । अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या भंगार बाजाराच्या जागेप्रश्नी व्यावसायिकांची अडचण समजून घेत महापौर भारती सोनवणे यांनी त्यांची मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांची भेट घडवून दिली. यावेळी आयुक्तांनी सर्व कायदेशीर बाजू व्यावसायिकांना समजावून सांगितली.

मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या या चर्चेप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, राजेंद्र घुगे, ईबा पटेल, विशाल त्रिपाठी, भारत कोळी, मनपा अधिकारी नरेंद्र चौधरी, माजी उपमहापौर करीम सालार, गफ्फार मलीक, हुसेन मुलतानी, शाकीर मुलतानी, नाजीर मुलतानी, फिरोज खान आदी उपस्थित होते.
महापौर भारती सोनवणे यांनी भंगार बाजार व्यावसायिकांची सर्व बाजू आयुक्तांसमोर मांडत योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली. आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी सांगितले की, तत्कालीन नपाने केलेल्या ठरावाला काहीही अर्थ नाही. कायद्यानुसार आज त्या जागेचा ताबा मनपाला घ्यावा लागणार असून त्याठिकाणी लिलाव प्रक्रिया राबवून रेडीरेकनरनुसार जागा १० वर्षासाठी देता येईल, असे त्यांनी सांगितले.


