
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरासाठी अभिमानाची बाब ठरणारी उल्लेखनीय कामगिरी करत येथील हेरंब पाटील याने देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT Bombay मध्ये प्रवेश मिळवला आहे. संगणक शास्त्र (Computer Science) या अत्यंत स्पर्धात्मक शाखेसाठी त्याची निवड झाल्याने सावदा शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेरंब पाटील हा सावद्यातील प्रख्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व डॉ. जितेंद्र पाटील आणि सौ. रोहिणी पाटील यांचा चिरंजीव असून त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. IIT Bombay, पवई येथे संगणक शास्त्र शाखेत प्रवेश मिळवणे हे अत्यंत कठीण मानले जाते. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थ्यांचीच या शाखेसाठी निवड होत असते.
हेरंबच्या या यशामुळे शहरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे हेरंबने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
त्याच्या या यशाबद्दल सावदा शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेषतः डॉ. व्ही. जे. वारके, डॉ. सुनिता वारके यांच्यासह अनेक मान्यवरांनी हेरंबच्या मेहनतीचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हेरंब पाटीलच्या यशामुळे सावदा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. IIT Bombay सारख्या नामांकित संस्थेत प्रवेश मिळवून त्याने आपल्या कुटुंबासह शहराचा मान उंचावला आहे.



