रशियाकडून AK-47 203 घातक रायफल मिळणार

 

मॉस्को , वृत्तसंस्था । भारतीय लष्कराच्या शस्त्र क्षमतेत वाढ होणार आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यात AK-47 203 ही घातक रायफल दाखल होणार आहे. रशिया आणि भारतात रायफलबाबतचा करार झाला आहे. ही रायफल हिमालयासारख्या उंचावरील भागात अधिक फायदेशीर ठरणार आहे. चीनसोबत लडाख आणि इतर सीमालगतच्या भागात सुरू असलेला तणाव पाहता या कराराला महत्त्व आहे.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. एके-४७ रायफलची ही अत्याधुनिक आवृत्ती इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम आता असॉल्ट रायफलची जागा घेणार आहे. हिमालयासारख्या उंच डोंगराळ ठिकाणी जॅमिंग आणि मॅगझीनमध्ये बिघाडासारख्या समस्या निर्माण होतात.

भारतीय सैन्याला सध्या ७ लाख ७० हजार रायफलची आवश्यकता आहे. त्यापैकी एक लाख रायफल आयात करण्यात येणार आहे. उर्वरीत रायफलची निर्मिती भारतातच करण्यात येणार आहे. भारतात रायफलची निर्मिती इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. ऑर्डिन्स फॅक्टरी बोर्ड आणि कालाश्निकोव कंसर्न व रोसोबोरोन एक्सपॉर्ट यांच्यात करार करण्यात आला आहे.

रशियाची निर्मिती असलेल्या एके-२०३ रायफल ही जगातील सर्वात अत्याधुनिक आणि घातक रायफलपैकी एक आहे. एका रायफलची किंमत ही ११०० डॉलरच्या घरात असू शकते. यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उत्पादनासाठी युनिट स्थापन करण्याबाबतच्या किंमतीचा समावेश आहे. AK-47 203 ही वजनाने हलकी आहे. यामध्ये ७.६२ एमएमच्या गोळ्यांचा वापर करण्यात येतो.

ही रायफल प्रति सेकंद १० आणि एका मिनिटात ६०० गोळ्या झाडते. ऑटोमेटिक आणि सेमी ऑटोमेटिक या दोन्ही मोडवर चालवता येऊ शकते. क्षमता ४०० मीटर इतकी आहे. पूर्ण लोड केल्यानंतर त्याचे वजन चार किलोंपर्यंत भरते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा या दौऱ्यात एस-४०० ही मिसाइल डिफेन्स सिस्टिम लवकरात लवकर मिळावी यासाठी आग्रह असणार आहे. या प्रणालीची पहिली खेप २०२१ च्या वर्षखेरपर्यंत मिळावी अशी अपेक्षा भारताला आहे.

Protected Content