महाजनादेश यात्रेनिमित्त जामनेरात मुख्यमंत्र्यांची ८ ला सभा (व्हिडीओ)

jamner press

जामनेर, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीकडून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘महाजनादेश यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला असल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना आखण्यासाठी तातडीने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे जामनेर येथे दि. ७ ऑगस्ट रोजी होणारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा ही दि. ८ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे, अशी माहिती ना.गिरीश महाजन यांनी आज (दि‌.६) आपल्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेत दिली.

 

ते म्हणाले की, शहरातील भुसावळ रोडवरील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही सभा होणार असून या ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे. सदर यात्रा ही जामनेरहून भुसावळ, जळगावमार्गे धुळयाकडे रवाना होणार आहे. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक आतिश झाल्टे, दिपक तायडे, अरविंद तायडे, गोविंद अग्रवाल आदी उपस्थित होते.

यावेळी ना. महाजन यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्त्युत्तर दिले. भारतीय घटनेतील ३७० कलम बाद झाल्यानंतर ना. महाजन यांनी नाचून आनंद व्यक्त केला असता, अजित पवार यांनी त्यांना नाशिकमधील भीषण पूर परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना न. महाजन यांनी नाशिकमधील पूरग्रस्तांना कशी मदत पोहोचवली याची तपशीलवार माहिती दिली, तसेच अजित पवार यांनी मात्र ते सत्तेत असताना, धरणात पाणी नसल्याने उपाययोजना करण्याची विनंती करायला आलेल्या शेतकऱ्यांना कोणते उत्तर देवून पाठवले होते, ते जरा आठवावे, असा टोलाही यावेळी लगावला.

 

Protected Content