जळगाव प्रतिनिधी । येथील रेल्वे माल धक्का पाळधी येथे स्थलांतरीत करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली असून यासाठी आ. गिरीश महाजन व खा. उन्मेषदादा पाटील यांनी आज ना. प्रकाश जावडेकर यांची घेतलेली भेट कारणीभूत ठरली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे माल धक्का हा पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत मागणी केली होती. येथे होणारी वाहतूक समस्या ,पिंप्राळा रेल्वे गेट जवळ होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे होणारे दैनंदिन अपघात मालीका आणि यात निष्पाप नागरीकांचे जाणारे बळी यामधून शहरवासीयांची सुटका व्हावी यासाठी हा रेल्वे माल धक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता.मात्र याकरिता पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अडचण असल्याने हा माल धक्का प्रश्न रखडला होता. या अनुषंगाने आज दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरिश महाजन भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत खासदार उन्मेश पाटील व उद्योजक सुनिल झंवर हे उपस्थीत होते.
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी वरील सर्व अडचणी मांडून रेल्वे माल धक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगीची अडचण दूर करावी ही मागणी केली.या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लागलीच रेल्वे माल धक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी देण्यासाठी तात्काळ आदेश दिले असून जळगाव माल धक्क्यासाठी गिरीश महाजन यांचा दिल्लीतून धक्का सफल ठरल्याने लवकरच हा माल धक्का पाळधी येथे स्थलांतरित होणार आहे.
शहराच्या पिंप्राळा रेल्वे गेट परिसरातील अनेक वर्षांपासून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण करणार्या रेल्वे माल धक्क्यामुळे नागरिकांना वाहतुकीची दररोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. आबालवृद्ध विद्यार्थी महिला नागरिकांचे मोठे हाल होत होते. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व समस्या व अडचणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे समोर मांडल्या. मंत्री जावडेकर यांनी याची तात्काळ दखल घेत परवानगीचे आदेश दिल्याने हा माल धक्का लवकरच पाळधी येथे स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शहरवासीयांची मोठी समस्या दूर होणार आहे.