
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये ज्वारी, मका आणि बाजरी या भरडधान्यांची खरेदी सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आता भरडधान्य खरेदीची मुदत २० जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाच्या वतीने एकूण १८ खरेदी केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव येथील केंद्रांचा समावेश आहे.
रब्बी हंगामातील हमीभाव (किमान आधारभूत किंमत) पुढीलप्रमाणे आहेत: ज्वारी: ₹ ३३७१/- प्रति क्विंटल, मका: ₹ २२२५/- प्रति क्विंटल, बाजरी: ₹ २६२५/- प्रति क्विंटल
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य पणन महासंघ लि. चे विभागीय संचालक संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि जळगावचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या मुदतवाढीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतीमाल योग्य भावात विकण्याची संधी मिळेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल अशी अपेक्षा आहे.



