जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक ३००’ या बोधचिन्हाचे अनावरण आज जळगाव येथे उत्साहात पार पडले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री खा. रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे आणि मिलिंद बुवा हे मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ‘पुण्यश्लोक ३००’ बोधचिन्ह तयार केले आहे. ६ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, या बोधचिन्हाचा वापर आता सर्व शासकीय पत्रव्यवहारात अनिवार्य करण्यात आला आहे. मंत्रालयीन विभाग, क्षेत्रीय कार्यालये, महामंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पत्रव्यवहारात या बोधचिन्हाचा समावेश करणे बंधनकारक असेल.
या उपक्रमामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी समाजामध्ये नव्याने जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.